सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले

author img

By

Published : Aug 31, 2021, 3:43 PM IST

CM Uddhav Thackeray

हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - दहीहंडी उत्सवावरून भाजपने सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच केंद्रानेही सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे. त्याची अंमलबजावणी करत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या.

हेही वाचा - जनआशीर्वाद यात्रा, मारामारी चालते; फक्त सणांमधूनच कोरोना पसरतो का? - राज ठाकरे

  • हे उपस्थित होते

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोकुळअष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.

त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  • काहीजण १०० टक्के राजकारण करतात -

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरे करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम आहे. दुर्देवाने आज १०० टक्के राजकारण केले जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  • गर्दी टाळा -

कोरोनाचे संकट दिसत असताना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे. आज प्रताप सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत, तसे करण्याची गरज आहे. दुर्देवाने तेवढी प्रगल्भ इतर काही लोकांमध्ये दिसत नाही. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवनही अडचणीत आणत आहेत. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे, येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अनेकजण तारीख पे तारीख जाहीर करतात, प्रत्यक्षात काही करत नाहीत. पण, पंधरा दिवसापूर्वी तारीख ठरवून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आमदार सरनाईक यांना शाबासकी दिली.

हेही वाचा - ईडीचा कारवाई.. भाजपचे हल्ले, शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, राज्यातील सद्य:स्थितीवर होणार चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.