मुंबई - राज्यात एकीकडे सत्ता संघर्ष सुरू असतानाच राज्य सरकारने ( State Government ) काही महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्याचा धडाका कायम ठेवला आहे. यात प्रामुख्याने काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबादच्या ( Aurangabad ) नामांतराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देणार असल्याची माहिती ही समोर येत आहे.
सध्याचे राजकीय घडामोडीत अचूक वेळ साधणार? - गेल्या अनेक दिवसापासून औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राजकीय अजेंड्याचा मुद्दा ठरला होता. विरोधकांसह अनेक राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतही याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर आता राज्याच्या सध्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ही अचूक वेळ साधली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील सूचना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. याबाबत आज मंत्रिमंडळात हा विषय मांडण्यात येणार आहे.
यामागे राजकीय खेळी? - सूत्रांच्या माहितीनुसार यामागे मोठी राजकीय रणनीती असून, काँग्रेस पक्षाशी मतभेद झाल्याचे दाखवत ठाकरे सरकार आपल्या पक्षातील आमदारांसोबत एकत्र येण्याची ही शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होतील, तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या भूमिकेत दिसतील, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये सुरू झाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण-
शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात पुन्हा वातावरण तापले आहे. शासनाच्या जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख झाल्याने MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी सेनेवर निशाणा साधला आहे. तर खैरे यांनी जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शहराचे नाव बदलण्यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे शनिवारी पाहायला मिळाले.
या कारणामुळे नामांतराचा प्रश्न पेटला - राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबाबत त्याचा जीआर काढण्यात आला आहे. राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे. त्यामुळे संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
हिम्मत असेल तर नाव बदलून दाखवा- खासदार जलील - राज्य शासनाच्या जीआरमध्ये औरंगाबादचा स्पष्ट संभाजीनगर उल्लेख करण्यात आलेला आहे. यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी असे केले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अथवा सरकारमध्ये हिम्मत असेल तर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करून दाखवावे. शिवसेना अनेक वर्षांपासून भावनिक राजकारण करत आहे. निवडणूक आली की तोच मुद्दा काढला जातो, तुम्ही नागरिकांना सांगितले आहे ना तर करून दाखवा, असे आव्हान देखील इम्तियाज जलील यांनी सरकारला दिले आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे प्रत्युत्तर - खासदार इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर देत असताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, आमच्यात हिम्मत आहे म्हणून आम्ही शहराचे नाव संभाजीनगर केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आदर सर्व पक्षांना आहे. भाजप विरोध करणार नाही, मनसेने तर या मागणीसाठी आंदोलनसुद्धा केले, राष्ट्रवादी देखील विरोध करणार नाही. त्यामुळे त्या औरंग्याचे नाव बदलणार आहोत. विरोध करणाऱ्या एमआयएमची अवस्था बघा, त्यांचे आठ नगरसेवक पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले आहेत. कारण हा एकटाच मज्जा मारतोय, अशी टीका खैरे यांनी केली.
हेही वाचा- Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र