औरंगाबाद : जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून ( Heavy rain in Aurangabad ) वाहू लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी गाव, तांडा आणि शेत वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. अशीच काही परिस्थिती सोयगाव तालुक्यातील वरठाण परिसरात पाहायला मिळाली. या भागात एवढा पाऊस झाला की शेतात राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह गावात आणण्यासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर गावकरी आणि महिलेच्या काही नातेवाईकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह गावात आणण्यात आला.
वीस दिवसांपासून सतत पाऊस : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला. सोयगाव तालुक्यातील वरठाण परिसरातील तिडका येथील अकबर शहा हे आपल्या कुटुंबासह गावापासून दोन किलोमीटर अतंरावर असलेल्या शेतात वास्तव्यास आहे. अकबर शहा यांची पत्नी हापिजा शहा यांचे सोमवारी पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दफनविधी गावातील कब्रस्तानमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
तब्बल आठ तास प्रतीक्षा : परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पुर आला आहे. त्यातच सतत सुरु असलेला पाऊस काही थांबत नव्हता. सोमवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली, तरी नदीला आलेल्या पुरामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. दुसरा रस्ता नसल्याने नदीचे पाणी कमी होण्यासाठी तब्बल आठ तास थांबावे लागले. अखेर कंबरेएवढे पाणी झाल्यावर गावकरी आणि शहा यांच्या काही नातेवाईकांच्या मदतीने हापिजा यांचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि दफनविधी करण्यात आला.