अमरावती - तपोवन संस्थेच्या वतीने आपली एक एकर शेती देवराई प्रकल्पासाठी दिली आहे. या ठिकाणी दहा बाय दहा फूट अंतरावर 40 ग्रीड्स मध्ये एकूण 86 प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. संलग्न असणाऱ्या चार ब्रेडमध्ये एक प्रकारची झाडे लावावी लागतात, ज्यामुळे सजातीय झाडे एकमेकांच्या संगतीत चांगली वाढतात या चाळीस हजार स्क्वेअर फुट जागेच्या केंद्रस्थानी बैठकीचे स्थान निर्माण करण्यात आले आहे. ज्याच्या सभोवताल हा संपूर्ण देवराई प्रकल्प राहणार आहे. ठिबक सिंचन पद्धतीने आठवड्यातून सरासरी तीन वेळा सुमारे अर्धा तास जरी पाणी दिले तरी या रोपांच्या वाढीकरिता पुरेसे असल्याची माहिती देवराई प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर राजेश शेरेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
जिल्ह्यात पाच ठिकाणी देवराई प्रकल्प - अमरावती जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी देवराई प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या देवराईमध्ये जांभूळ, हिरडा, पिंपरंट, मोगरा ,बीजा, चेरी, सीता अशोक, बुद्धा नारळ, पिवळी कांती, तामण, तुती, वावळ, अग्नि मंथ, या व इतर अशा 86 प्रजातींची लागवड सुरू आहे. अमरावती शहरात तपोवन संस्थेच्या परिसरात देवराईची निर्मिती होत असून चांदूर रेल्वे येथे यशवंत देवराई, चांदूरबाजार तालुक्यात नरसिंग देवराई, तळवेल येथे कृष्णर्पण देवराई अशा पाच देवराईची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी श्री अंबादेवी ट्रस्टचे विश्वस्त आणि तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी उद्योजक आणि कृषी व्यावसायिक प्रमोद देशमुख तळवेलकर, सहकार क्षेत्रातील नेते राजाभाऊ देशमुख आणि तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई विश्वस्त विवेक मराठे, जुबीन डोटीवाला आणि तपोवन संस्थेचे सचिव सहदेव गोळे हे प्रामुख्याने सहकार्य करीत आहेत.
असे आहेत देवराईचे फायदे - देवराईत प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते . याचा आपल्यावर व त्यासोबतच सभोवतालच्या सृष्टीवर सुद्धा सकारात्मक फरक पडतो. देवराईच केंद्रस्थान हे मेडिटेशन सेंटर बनू शकते असे डॉ. राजेश शेरेकर म्हणाले आहेत. यासह सुमारे 86 विविध प्रजाती असलेली देवराई ही विद्यार्थ्यांसाठी व कृषी तज्ञांसाठी एक पर्यटन स्थळ बनू शकते. कायमस्वरूपी अन्नपाण्याची सोय झाल्यामुळे देवराई ही अनेक सजीवांचे आश्रयस्थान होईल. देवराईमुळे मातीची धूप थांबते व हवेतील प्रदूषित धुलीकरण रोखण्यास मदत होते. देवराई प्रकल्पातून वाढलेल्या झाडांपासून आपल्याला बिया मिळतात, ज्यापासून पुन्हा रोप निर्माण होऊन ते इतर ठिकाणी रोपण करताना फायदेशीर ठरणार आहेत.
लुप्त होणाऱ्या प्रजातींचे संरक्षण - पूर्वी 80 ते 90% असणारे जंगल आज केवळ दहा ते पंधरा टक्क्यांवर आले आहे. संपूर्ण पृथ्वीवर जर कुठल्या जीवाने वसुंधरेचा सगळ्यात जास्त नुकसान केले असेल तर तो मनुष्य असून मूळ जंगले नष्ट करून मानवाने केवळ स्वतःच्या उपयुक्तेसाठी आवश्यक असणारे पिकं घेऊन इतर वनसृष्टी मोठ्या प्रमाणात नष्ट केली आहे. त्यामुळे या वनसंपदेवर अवलंबून असणारे कीटक मधमाशा मुंग्या फुलपाखरे पक्षी प्राणी व इतर बहुतांश प्रजाती लुप्त होण्यास सुरुवात झाली असून सध्या स्थितीत सरासरी 15 ते 20 टक्के जीवच पृथ्वीवर शिल्लक राहिले आहेत. परिणामतः त्या जीवसृष्टी द्वारा बीज प्रसारणावर अवलंबून असणाऱ्या वनसृष्टीची पुन्हा निर्मिती झाली नाही. याचा परिणाम म्हणून अनेक प्रजाती झपाट्याने लुप्त होऊ लागल्या आहे. दरम्यान, पर्यावरणीय असंतोष मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे दुष्काळ अतिवृष्टी जमिनीचे भूस्खलन आणि विविध रोगराई पसरण्यास सुरुवात झाली, ज्याचा परिणाम इतर जीवसृष्टी खेरीज सगळ्यात जास्त प्रमाणात मानवालाच भोगाव लागतो आहे. याबाबत देखील देवराईच्या माध्यमातून जनजागृती करून समाजात वनसंवर्धनाची महती पटविण्याचे कार्य केले जाणार असल्याचे डॉ. राजेश शेरीकर म्हणाले.
पुण्याच्या देवराई फाऊंडेशनचे सहकार्य - अमरावती अमरावती जिल्ह्यात सकारात असणाऱ्या देवराई प्रकल्पासाठी पुणे येथील देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले पाटील यांचे अतिशय मोलाचे सहकार्य मिळाल्याचे डॉक्टर राजेश शेरेकर यांनी सांगितले. देवराई फाउंडेशन पुणेच्या वतीने सुमारे 16 लाख 13 हजार रोपांची दान आणि नऊ लाख 94 हजार रोपे नर्सरी उभारणीसाठी अमरावतीच्या प्रकल्पासाठी मोफत मिळाली आहेत. देवराई फाउंडेशन पुण्याच्या वतीने महाराष्ट्र आणि राज्याबाहेर 132 मानवनिर्मित देवराया 42 घन वन आणि 24 ठिकाणी नर्सरी उभारण्यात आलेली आहे. वृक्ष लागवड आणि वनसंवर्धनासाठी देवराई फाउंडेशन पुण्याच्या वतीने कुठलेही शुल्क आकारले जात नाही. अमरावतीतही आमच्या पाचही देवराई बहरल्यावर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला अगदी मोफत रोपांचे दान आम्ही करणार आहोत. जिल्ह्यातील एकूण पाच पैकी अमरावती शहरातील तपोवन परिसरात भरणारी देवराई ही केवळ जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श देवराई आम्ही घडवणार आहोत, असे देखील डॉक्टर राजेश शेरेकर यांनी स्पष्ट केले आहे.