Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, आज लागणार निकाल?

author img

By

Published : Oct 20, 2021, 12:41 PM IST

Lakhimpur Violence

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयात हरीश साळवे यूपी सरकारच्या वतीने हजर झाले आहेत. लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणी दरम्यान खंडपीठाने 20 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळावरील सर्व पुरावे सुरक्षित ठेवण्यास आणि त्यांना नष्ट होऊ न देण्याचे आदेश दिले होते. सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी या सुनावणीत उत्तर प्रदेश सरकारला फटकारले होते. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर आम्ही समाधानी नसल्याचे न्यायमूर्ती म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयात उत्तर प्रदेश सरकारची बाजू वकिल हरिष साळवे मांडत आहेत. साळवे यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की, सीबीआय चौकशी यावर उपाय नाही. दुसरा मार्ग शोधावा, असे साळवे मागील सुनावणीत म्हटले होते. तसेच विशेष तपास पथकाने 3 ऑक्टोबर रोजी तिकुनियामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात सहा फोटो सार्वजनिक केले आहेत. त्यातील संशयितांना ओळखण्याचे आवाहन पथकाने जनतेला केले आहे.

नेमकं काय घडले होते?

रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली.

हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे. आशिष मिश्राविरोधात 302, 304 ए, 147, 148, 149, 279, 120 बी यासह सर्व गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - केंद्र सरकारने गृह राज्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा- शरद पवारांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.