Haryana Nuh Violence : नूह हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू, 116 जणांना अटक, गुन्हेगाराला सोडणार नाही : मुख्यमंत्री खट्टर
Published: Aug 2, 2023, 2:48 PM


Haryana Nuh Violence : नूह हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू, 116 जणांना अटक, गुन्हेगाराला सोडणार नाही : मुख्यमंत्री खट्टर
Published: Aug 2, 2023, 2:48 PM

नूहच्या हिंसाचारावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, किमान 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारामागील लोकांची ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत एकूण 116 जणांना अटक करण्यात आली आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नूह (हरियाणा) : हरियाणातील नूह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) ब्रज मंडल यात्रेनंतर हिंसाचाराची घटना घडली. या हिंसाचारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या संघर्षाच्या निषेधार्थ आज हिंदू संघटनांनी मानेसरमध्ये पंचायत बोलावली आहे. यासोबतच विहिंपने पानिपतमध्येही बंदची हाक दिली आहे.
कलम 144 लागू : हरियाणातील नूह, पलवल, फरिदाबाद, रेवाडी, गुरुग्राम, महेंद्रगड, सोनीपत आणि पानिपत या 8 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मंगळवारी गुरुग्राम वगळता बहुतांश भागात परिस्थिती सामान्य होती. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत नूह जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, नूह हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 2 होमगार्ड जवान आणि 4 नागरिकांचा समावेश आहे. हिंसाचारात जखमी झालेल्यांना नल्हार आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राकडून हरियाणा पोलिसांच्या 30 तुकड्या आणि निमलष्करी दलाच्या 20 तुकड्या हिंसाचारग्रस्त भागात पाठवल्या जाणार आहेत. यापैकी 14 युनिट नूह, 3 पलवल, 2 फरिदाबाद आणि एक गुरुग्रामला पाठवण्यात आली आहे.
116 जणांना अटक : सीएम मनोहर लाल म्हणाले की, समाजकंटकांची ओळख पटवली जात आहे. नूह हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एकूण 116 जणांना अटक करण्यात आली आहे. दोषी किंवा सूत्रधार कोणीही असला तरी, त्याला सोडला जाणार नाही. आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी केली जाईल, जेणेकरून हिंसाचारात सहभागी असलेल्या आणखी लोकांना अटक करता येईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, सध्या नूह आणि आसपासच्या भागात परिस्थिती सामान्य आहे. सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. नागरिकांना शांतता आणि बंधुभाव राखावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. नूह हिंसाचारानंतर गुरुग्राममध्येही हिंसा सुरू झाली. सोमवारी रात्री लोकांच्या जमावाने एका धार्मिक स्थळाला आग लावली. यापूर्वी धार्मिक स्थळावरही गोळीबार करण्यात आला होता.
हेही वाचा-
